मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

खांदेपालटानंतर अवघ्या चोविस तासात डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सला नोटीस, डिबेंचर धारकांचे पैसे तातडीने द्या अन्यथा ………

खांदेपालट झाल्यानंतर अवघ्या चोविस तासात डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि ( डीएसकेडीएल)ला डिबेंचर धारकांचे पैसे तातडीने न दिल्यास कारवाईला सामोरे जाण्याची नोटीस मिळाली आहे.

’तुम्ही फक्त लढ म्हणा‘ असे म्हणत शड्डू ठोक़ून गुंतवणूकदारांना दिलासा  दिल्याचा आव आणल्यानंतर अचानक डीएसकेंनी आपली तलवार म्यान केली आणि चिरंजीव शिरिषची ढाल पुढे केली.

डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून डीएसकेंचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. 

व्यवस्थापकीय संचालक असलेले डीएसके पदावरून पायउतार झाले असून ते अ-कार्यकारी रूपात संचालक मंडळाचे व कंपनीचे अध्यक्ष म्हणून कायम रहाणार आहेत.

म्हणजेच यापूढे डीएसकेंना कंपनीत कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत.

दरम्यान, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या नॉन कन्वर्टीबल डिबेंचर्स (एनसीडीं)च्या विश्‍वस्तांच्या वतीने म्हणजे कॅटॅलिस्ट कंपनीने (डिबेंचर ट्रस्टी) सुचवलेल्या  शशांक बी. मुखर्जी यांच्या नावाला संचालक म्हणून नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली.

पुढे जाण्याआधी शशांक मुखर्ज़ी यांच्या नियुक्तीचे कारण काय होते ते समजावून घेउ.




डीसकेडील कंपनीच्या एनसीडींची कॅटॅलिस्ट ही विश्वस्त कंपनी आहे.

या कंपनीने डीएसकेडीएलने एनसीडीचे व्याज न दिल्याने त्यांना नोटीसा दिल्या होत्या.परंतू डीएसकेडीएलने त्या नोटीसींना काहीही उत्तर दिले नव्हते.

परिणामी कॅटॅलिस्टने सेबीला शशांक मुखर्जी यांची डीएसकेडीएल कंपनीवर नॉमीनी डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली.

७ सप्टेंबरला ही नियुक्ती झाल्यानंतर लगेचच दुस-या दिवशी देण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये ६० दिवसात डिबेंचर धारकांचे पैसे व्याजासह न दिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.



असो.

डीएसकेंचे कार्यकारी अधिकार काढून घेउन शिरिष कुलकर्णी यांच्या नियुक्तीने काय साध्य होईल हे येणारा काळच ठरवेल.

काही महिन्यांपुर्वीच कार्यकारी संचालक असलेले शिरीष कुलकर्णी ह्यांनी अचानक राजीनामा दिला होता आणि आता अचानक असं काय घडलं की त्यांनी वडीलांनाच बाजूला करून कंपनीचा ताबाच घेतला!

डीएसकेडीएल तसेच डीएसके टोयोटा आज कर्जबाजारी आहे, डीएसके टोयोटा ह्यांची तर डीलरशीप देखिल गेली आहे!

ठेवीदार, ग्राहक, वित्तीय संस्था ह्या सगळ्यांचे पैसे डीएसकेडीएल च्या कामांना न वापरता डीसकेंच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक कंपन्यांकडे वळविण्यात आला व त्या कंपन्यांच्या प्रचंड तोट्यात आल्या आता त्या कंपन्यांचे सर्वेसर्वा शिरीष कुलकर्णी डीएसकेडील चे सर्वाधिकारी बनले आहेत!


ज्या डीएसके टोयोटाचा कारभार शिरीष बघत होते ती बंद पडली व तिथल्या कर्मचा-यांनी डीएसकेंच्या घरासमोर कित्येक महिने थकलेल्या आपल्या हक्काच्या पगारासाठी चक्क घरणे धरली.

परंतु शिरीष कुलकर्णींना पाझर फुटला नाही.

त्या कर्मचा-यांना भेटण्याचे देखिल ज्यांनी टाळले असे शिरिष कुलकर्णी आता ठेवीदार, गुंतवणूकदार, ग्राहक ह्यांना त्यांची देणी परत देणार कि त्यातून आणखी काही वेगळा मार्ग काढणार ?  हा मोठा प्रश्नच आहे .

दरम्यान डीएसकेडीएल च्या कर्मचा-यांनी त्यांचा पगार न मिळाल्याने कामगार आयुक्तांकडे दाद मागीतली होती.काल त्याची तारीख होती.

परंतु डीएसकेडीएलच्या व्यवस्थानाने (?) त्या तारखेला गैरहजर रहाणे पसंत केले.

आता नाईलाजाने कामगार आयुक्तांनी पुढील तारीख दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी १८ सप्टेंबरला होईल.
१८ सप्टेंबरला जे काही होईल ते पहाता येईल.

परंतु यावरून डीएसकेडीएलची कामगारांबाबतची अनास्था दिसून येते.

दुसरीकडे डीएसकेंडीएलचे ( की डीएसकेंच्या कुटुंबियांच्या कंपन्यांचे) ठेविदार म्हणजे एफडी  होल्डर्स रोज नव्या भूलथापांना बळी पडत आहेत असे दिसते .

या एफडी होल्डर्सचा व्हॉट्सॲप ग्रुपवरील संवाद वाचले तर त्यावरून एखादी छानसी विनोदी कादंबरी तयार होईल असे वाटते.

मध्यंतरी या ग्रुप्सवर कुणीतरी भानुदास नामक व्यक्तीचा संवाद फिरत होता.

हा भानुदास म्हणे एका माजी मंत्र्याचा खाजगी सचिव होता.

त्याने म्हणे डीएसकेंच्या सर्व कारभाराचा हिशोब करून त्यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी भांडवदार उभा करण्याचे ठरवले होते.

या भानुदासचे पुढे काय झाले हे माहिती नाही.

परंतु आता असाच आणखी  एक संवाद त्या ग्रुप्सवर फिरत आहे.

त्यात एक व्यापारी म्हणे डीसकेंच्या कंपनीमध्ये ५०% भागीदार व्हायला तयार असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

आता हा व्यापारी ५०% गुंतवणूक कोणत्या कंपनीत आणि का करणार? त्यातून त्याचा फायदा काय ? आतबट्याच्या कंपनीत गुंतवणूक करून तो स्वत:चे नुकसान का करून घेईल? हे प्रश्न विचारायला मात्र या ग्रुप्सवरील कुणी तयार नाही.

असो..

या सर्व पार्श्वभूमीवर डीएसकेडीएल कडून काही हजार ठेविदार, फ्लॅट खरेदीदार, कर्मचारी , पुरवठादार , बँका यांना दिलासा मिळेल असा खुलासा किंवा कंपनी या सर्व प्रकारातून कशी बाहेर पडणार त्याची योजना काय आहे याबाबत स्वच्छ आणि खरे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक् होते.

परंतु तसे घडले नाही.

कारण डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांना बँका, वित्त पुरवठा संस्था, गुंतवणूकदार, कर्मचारी , पुरवठादार यांच्याबद्दल काडीमात्र आस्था नाही.

आताची परिस्थिती अशी आहे की सर्व बँका, वित्त पुरवठा संस्था, गुंतवणूकदार, कर्मचारी , पुरवठादार यांची देणी भागवून रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे , ते प्रकल्प पूर्ण झालेच तर आधी ज्यांचे पैसे घेतलेत त्या फ्लॅटधारकांना ते देणे आणि त्यातून उरलेले फ्लॅट विकून त्यावर नफा मिळवणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

हे सर्व एकाच परिस्थितीत शक्य आहे .

ते म्हणजे सर्व बँका, वित्त पुरवठा संस्था, गुंतवणूकदार, कर्मचारी , पुरवठादार यांनी आपली येणी ही ‘लोकवर्गणी‘ समजून डीसकेंना माफ केली किंवा डीसकेंनी ती द्यायला हात वर केले तर कदाचित एखादा प्रकल्प मार्गी लागू शकेल.

डीएसकेडीएल च्या एकूण प्रकल्पांवर आणि मालमत्त्तांचा विचार केला तर् त्यांच्या सर्व मिळ्कतींवर भरमसाट् कर्ज आहे.

एक मिळ्कत जी पेरण्याला होती ज्यावर सहा हजार् फ्लॅट बांधणार असे डीसके सांगत असत. ती मिळकत देखील मागील डिसेंबरमध्ये त्यांनी विकल्याचे दिसते.

आता इतर कुठे किरकोळ मिळकत असलीच तर ती विकून डीएसके काही काळ म्हणजे काही दिवस देणेक-यांना थोपवू शकतील.

परंतु पुढे काय ?

 एकच शक्यता आहे.

आपल्याकडे  कर्ज बुडवण्यास मोठ्या बँका सहकार्य करायला नेहमी तयार असतात.

मागे नाही का ? विजय मल्या देशाबाहेर जाईपर्यंत बँकानी त्याच्या हजारो कोटींच्या कर्जाचा पाठपुरावा केला नाही.

तो पळून जाताच कर्जवसूलीसाठी बँकानी न्यायलयाचे दरवाजे ठोठावले आणि एवढे करून स्टेट बँक ऑफ इंडीयाने त्याचे १२०० कोटीचे कर्ज माफ केले.

आता मल्या देशाबाहेर मजा करतोय आणि त्याचा मुलगा देशात!

वर्तमानपत्रांध्ये सिद्धार्थचे दिपीका पडूकोन, कतरीना कैफ यांच्याशी सूत जुळलेय की सोनल चौहानशी याच्या बातम्या येत असतात.

तसेच सहकार्य सर्व बँका, वित्त पुरवठा संस्था, गुंतवणूकदार, कर्मचारी , पुरवठादार यांनी डीसकेंना केले तरच मग ते पुन्हा नव्या जोमाने ’ ’तुम्ही फक्त लढ म्हणा’ असे म्हणू शकतील.

Related Stories









Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा